मी नोव्हेंबरनंतर पद सोडणार, पवार आता तरुणांना संधी देणार
जयंत पाटील म्हणाले, ‘राज्यातील नव्या पिढीला उभे करण्याचे काम शरद पवार आता करणार आहेत. आता माझ्या कार्यकाळाची मुदत चार महिने राहिली आहे. नोव्हेंबरनंतर मीच पद सोडणार आहे. तोपर्यंत याबद्दल कोणी जाहीर बोलू नका. जे काही असेल त्याची तक्रार पवार यांच्याकडे करा. ते जो निर्णय देतील तो मान्य राहील,’ असेही पाटील म्हणाले.
मोदींवर कडाडून हल्ला
राजकीय पक्ष म्हणून आम्ही एकमेकांवर टीका करतो. पण टीका करताना आम्ही मर्यादा ठेवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्याबाबतीत काय बोलले? मी भटकती आत्मा आहे. एका दृष्टीने हे बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) येथील आयोजित कार्यक्रमातून केला आहे.
नगरमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा
कार्यक्रमास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, खासदार नीलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यासह राज्यातून आलेले पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाचा वर्धापनदिन, नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार, फटाक्यांची आतषबाजी यावेळी करण्यात आली.